मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्यात आज पाचव्या टप्प्यातले मतदान होत आहे. मुंबईतील सर्व जागांसह राज्यातील एकूण 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात सहकुटुंब मतदान केले. यावेळीही राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. गेल्या निवडणुकीत भाजपविरोधात थेट भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी यंदा महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेतल्या. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात पहिल्या तास दोन तासांमध्ये म्हणजेच सकाळी 7 ते 9 या वेळेत सरासरी 6.33 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढायला हवा. सध्या ऊन जास्त आहे. मतदार बाहेर पडतील आणि त्यांचा हक्क बजावतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन कराल, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर काही नाही तेच आपले घिसेपिटे वाक्य, मतदानाचा हक्क बजवा, असे मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिले.
लोकसभा निवडणुकीत महिला मतदार टर्निंग पॉर्इंट ठरतील का? त्या सायलेंट फॅक्टर असतील का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर राज यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. मला माहीत नाही रे. मी काय भविष्यवेत्ता नाहीए रे.. मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. यानंतर राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह मतदान केंद्रातून निघाले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी वांद्य्रात मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. मतदार जुमलेबाजीला त्रासले आहेत. आपला मतदान हक्क यापुढेही अबाधित राहावे यासाठी लोक बाहेर पडलेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता पैसे घेऊन आपल्याला विकायला कोणी तयार नाही, असे त्यांनी म्हटले.