लोकशाही न्युज नेटवर्क –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानसंबंधी विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो, असे विधान मणिशंकर अय्यर यांनी केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर हे नेहमीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर भर देत आले आहेत. ते म्हणाले की, सरकार पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावू शकते. परंतु भारत शेजारी राष्ट्राचा आदर करत नसेल तर त्याची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते.
“पाकिस्तानकडे अणुबाँब आहे. आपल्याकडेही अण्वस्त्र आहेत. पण जर एखाद्या वेड्याने लाहोरवर अणुबाँब टाकण्याचा विचार केला तर त्याचे किरणोत्सर्ग अमृतसरपर्यंत पोहोचायला ८ सेकंदही लागणार नाहीत”, असा इशाराच मणिशंकर अय्यर यांनी दिला. आपण जर पाकिस्तानचा आदर राखला तर तेही शांतता राखतील. पण आपण त्यांना डिवचले आणि एखाद्या माथेफिरूने आपल्यावर अणुबाँब टाकला तर काय होईल? असाही प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.