जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आता उकाड्यापासून सुटका होणार असून थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुार सध्याच्या घडीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेलं ढगाळ वातावरण आता कमी होताना दिसणार आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान कोरडं राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यावर पावसाचं सावट होतं. बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणही पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हे सावट दूर होणार असून, किमान तापमानातही मोठी घट होणार आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिवाळा जाणवू लागणार असल्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
तसेच पुढील 24 तासांमध्ये अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.