मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत. उत्तर भारतात गेली काही दिवस सलग तापमानात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण (Rainy weather) झाली आहे. ऐन हिवाळ्यात उत्तरेत बहुतांशी ठिकाणी ऊन, पाऊस, गारठा, धुके आणि हिमवृष्टी असं संमिश्र वातावरण नोंदलं गेलं आहे. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.
Isolated hailstorm also likely over Uttarakhand during next 2 days and Punjab, northwest Uttar Pradesh, Bihar, Sub-Himalayan West Bengal- Sikkim and Meghalaya during next 24 hours.
— India Meteorological Department (@Indiametdept) February 25, 2022
पुढील तीन दिवसांत वायव्य भारतासह ईशान्य भारतात बहुतांशी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. येत्या चोवीस तासांत पंजाब, वायव्य उत्तर प्रदेश, बिहार, हिमालयातील काही प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मेघालयात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याचीही शक्यता आहे.
सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि आसपासच्या प्रदेशात नवीन अस्मानी संकट तयार होण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी रोजी या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील 24 तासांत दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरासह दक्षिण अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर सुसाट वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. दरम्यान येथील वारे 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. येथील वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मात्र याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. मागली काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. त्यामुळे दिवस कडक उन्हाचा चटका आणि रात्री थंडगार वारे सुटत आहेत.