जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने 25 नोव्हेंबर सायंकाळ नंतर ते 28 नोव्हेंबर पर्यंत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट तर 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कमी दाबांचे दोन आस तयार झाल्याचा परिणाम म्हणून साधारण २६ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत गारपीटीची शक्यता असते. मात्र यावेळी नोव्हेंबरमध्येच काही भागात दोन दिवस मध्यम पावसासह गारपीटीची शक्यता आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्ठभागापासून दीड़ किलोमीटर उंचीवर हवामानात झालेल्या बदलाचा हा परिणाम आहे. तसेच वायव्य उत्तर भारतातून थेट मध्य प्रदेश, गुजरातपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात ६ किलोमीटर उंचीवर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.