हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है – सुभाष तळेकर

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मुंबईचे डबेवाले (Dabwale of Mumbai) आज जगभरात प्रसिद्ध आहेत. १८९० साली म्हणजेच इंग्रजांच्या काळात मुंबई डबेवाला या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा पासून आज पर्यंत अविरत सेवा आम्ही देत आहोत. व्यवसाय कोणताही असो त्यात आपले समर्पण महत्वाची भूमिका पार पाडते. व्यवसाय करण्यासाठी किंवा त्याला प्रगतीपथावर पोहचविण्यासाठी तुमचे नियोजन, वेळेचे महत्व, काम करण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाची शिस्तबद्धता आहे. या सर्व गोष्टी आपल्याकडे असतील तर तुमचे काम तुमची ओळख निर्माण करण्याचे काम नक्की करेल त्यामुळे हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है ! असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरीग अँन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आयोजित कार्यक्रमात “डीफेक्ट फ्री ऑपरेशन मेनेजमेंट” या विषयवार ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई डबावाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर, रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,  की मुंबई कधी थांबत नाही, पण मुंबईमध्ये असंच कधीही न थांबणारं एक सैन्य आहे,  मुंबईचे डब्बेवाले पाच हजार लोकांची डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आगळीवेगळी सेना, न थकता, लोकांची सेवा करत आहे. मुंबईचे डब्बेवाले दररोज दोन लाखाहुन अधिक टिफीन सकाळी घरातुन कलेक्ट करतात, ज्याचा त्याचा टिफीन त्या त्या ऑफीसमध्ये बिनचुक पोहचवतात, आणि नंतर रिकामे डबे जमा करुन, ज्याच्या त्याच्या घरीही पोहोचते करतात. एकशे तीस वर्षांपासुन मुंबईचे डब्बेवाले भुकेच्या वेळेला डबे पोहचवण्याचं काम, नेटानं करत आहेत. तुलनेनं अडाणी असणार्‍या, निरक्षर लोकांचं व्यवस्थापन इतकं उत्कृष्ट आहे की ह्यांच्या मॅनेजमेंट आणि टिमवर्कला पाहुन जग थक्क होतं. यांचं कौतुक इंग्लंडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्सने केलं, व्हर्जिन ग्रुपचे मालक रिचर्ड ब्रॅंन्सन ह्यांनी सुद्धा डबेवाल्यांची प्रत्यक्ष भेटुन स्तुती केली. जगातली टॉपची विश्वविद्यालये सुद्धा ह्यांची केसस्टडी करतात. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कित्येक नावलौकिक व अगणिक रुपयांची उलाढाल करणारे उद्योग, उद्योजक आहेत. परंतु जगप्रसिद्ध मुंबईची ओळख निर्माण करणारे मुंबईचे डबेवालेच आहेत. मुंबईचे डबेवाले म्हटले की, त्याची वेगळी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. त्यांचे काम, त्यांचे नियोजन, वेळेचे महत्व आणि वेगळेपण यामुळे सिक्स सिग्मा या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. व्यवस्थापन हा विषय प्रत्येक घटकाशी निगडीत आहे. त्यामुळे व्यवसाय क्षेत्रातील व्यवस्थापनाचे महत्व काय असते हे आपल्याला मुंबईच्या डबेवाला यांच्या कडून चांगल्याप्रकारे शिकता येईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अंजली बियाणी यांनी मानले तर प्रा. तन्मय भाले, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख,  प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन व प्रा. योगिता पाटील यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

 

सुभाष तळेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले मुद्धे

१) टाईम मॅनेजमेंट

जेवणाचा डबा जेवणाच्या वेळेत पोहोचला तरच त्याला महत्व आहे. मुसळधार पाऊस पडो, महापुर येवो किंवा महाभयंकर ट्रॅफिक जाम असो, डबेवाले कधीही लेट होत नाहीत. ठरलेल्या वेळी ते डबा कलेक्ट करतील, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ते डबा पोहचवतीलच. कामातला हा चोखपणा त्यांची वेगळी ओळख निर्माण करतो. डबावल्यांचे दिवसातले कामाचे तास म्हणजे फक्त सहा घंटे आहेत. पहील्या तीन तासात ते घरातुन डबे जमा करतात. नंतरच्या तीन तासात ते ऑफीसातुन डबे घेऊन घरी वापस देतात. कधीही, कसल्याही परिस्थीतीत डबेवाले आपल्या वेळेची मर्यादा तोडत नाहीत, म्हणुनच की काय एका टिफीनवर सुरु झालेली ही सेवा आज दोन लाख डब्यांवर पोहोचली आहे. “जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करु शकत नसाल, तर तुमच्या आयुष्यात काहीही मॅनेज करु शकत नाही.”

२) शिस्त

मुंबईचे डब्बेवाले स्वतःतर शिस्त पाळतातच, त्यासोबत ग्राहकांनाही शिस्त लावतात. एखाद्या घरी डबा घेण्यासाठी गेल्यास तो डबेवाला मोजुन चार मिनीटे डब्याची प्रतिक्षा करतो, आणि पाचव्या मिनीटाला तो घर सोडतो. त्यांच्या ह्या शिस्तीमुळे ग्राहक आपापले डबे तयार ठेवुन त्यांची वाट बघतात. जे ग्राहक वारंवार उशीर करतात, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात, आणि अशा कस्टमरला सेवा देणे डबेवाल्यांकडुन थांबवले जाते. शिस्त असल्याचा अजुन एक फायदा आहे, हे लोक नेहमी व्यस्त असतात. जे लोक शिस्तीत जगतात, त्यांच्या जीवनात फालतुचे टेंशन नसतात, त्यांचं पुर्ण लक्ष त्यांच्या कामावर असतं. एकाग्रतेमुळे उत्पादनक्षमता वाढते. शिस्तप्रिय लोकांचं समाजात कौतुक होतं.

३) निष्ठा

मागच्या एकशे तीस वर्षांपासुन फक्त आणि फक्त एकच काम. डबे पोहचवण्याचं. संपुर्ण फोकस त्या एकाच कामावर. कुठलाही धंदा तेव्हा अपयशी होतो, जेव्हा आपल्या मुळ हेतुपासुन तो दुरावतो. काम सुरु करताना एक उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवलेला असतो, पण तो हेतु विसरताच, कामातला अनोखेपणा, विश्वासार्हता आणि गुडविल हरवायला लागतं.

४) कामावर प्रेम करा

बहुतांश डबेवाले हे वारकरी संप्रदायाला मानणारे असतात. भुकेलेल्यांना अन्न पोहचवणे हे खरोखर पुण्यांचं काम! भक्तीभावाने ते हे काम मनापासुन करतात, विठ्ठलाच्या नामस्मरणातुन त्यांना उर्जा मिळते. डबा पोहचवणं, ही त्यांच्या लेखी एक प्रकारची भक्ती आहे. म्हणुन सेवाभावाने ते काम आनंदाने करतात. आपल्या प्रोफेशनबद्द्ल आपल्याला सन्मान असावा, आपलं आपल्या कामावर मनापासुन प्रेम असावं, ते काम करताना वेळेचं भानही जाणवु नये, पॅशनने केलेल्या कामात यश मिळतचं मिळतं

५) टीमवर्क

दोन लाख डब्यांची देवाणघेवाण शक्य कशी होते, त्यासाठी प्रत्येक डब्यावर एक कोड असतो, त्या कोडवरुन डब्यांची सॉर्टींग केली जाते, डबेवाला आपापल्या एरीयातले डबे घेऊन डबे पोहचवतो. हा सारा प्रवास सायकलीवरुन आणि लोकलच्या डब्यांमधुन केला जातो. ह्या साखळीमध्ये टीमवर्कला अफलातुन महत्व आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.