मुंबई ;- मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन करणारं हे पहिलं सरकार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. सरासरी प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये १००- सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असातना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली हा खरा प्रश्न आहे.”