अलिबाग, लोकशाही न्युज नेटवर्क
‘देशात ‘इंडिया’चे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे वैभव परत आणणार असून इथून पळवलेले उद्योग, आर्थिक केंद्र महाराष्ट्रात परत आणल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण विनाशकारी प्रकल्प राज्यातील कोकण किनारपट्टीवर आणायचे आणि कंत्राटी रोजगार देऊन त्यांच्या जमिनी घ्यायच्या. त्यामधून होणारे अर्थचक्र हे गुजरातसाठी फिरवणार. राख महाराष्ट्राकडे आणि रांगोळी गुजरातमध्ये काढणार का? हे सर्व एका कंत्राटदार मित्रासाठी आहे’, असे आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. ‘तुम्ही दरवाजे उघडे ठेवले तरी मी तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे येण्याची गरजच लागणार नाही, कारण तुम्हीच तिथे राहणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनंत गीते यांची प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे अलिबाग येथे आले होते. ‘मोदी व शहा यांना पराभवाचे भूत समोर दिसत असल्याने ते राम राम करत फिरत आहेत. मात्र, जय भवानी, जय शिवाजी हा आमचा आत्मा असून तो आम्ही बदलणार नाही’, असे ते म्हणाले. ‘गुजरातचा विकास करत असताना महाराष्ट्राचा घास काढून तो गुजरातला देणार असाल तर हात कापून टाकल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ‘आम्ही गुजरातच्या विरोधात नव्हतो व नाही. ‘इंडिया’चे सरकार आल्यानंतर गुजरातचे जे आहे, ते त्यांना देणार, असे वचन त्यांनी यावेळी दिले. ‘भाजपचा महाराष्ट्राविषयी आकस पदोपदी दिसत आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बुरसटलेल्या विचारांना मान्य नसल्याने ते बदलायचे आहे. ही बुरसटलेली वृत्ती आपल्याला जगू देणार नाही’, असा आरोप त्यांनी केला.
‘भाजपची हुकूमशाही’
‘भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा, अशी हुकूमशाही आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी नाही, आरोप सिद्ध झालेली नाही तरी त्यांना तुरुंगात टाकले. मात्र प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले, पण तरीही त्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंगमध्ये टाकून त्यांना उमेदवारी दिली. नेत्यांना नाही तर कार्यकर्त्यांना तरी लाज वाटते की नाही’, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
‘एलन मस्क का आले नाहीत?’
‘वेदांत फॉक्सकॉन गुजरातमध्ये वळविला. मात्र तिथे सोयी नसल्याने तो तिथूनही निघून गेला. ‘टेस्ला’चे मालक एलन मस्क हे बोलणी करणार होते. मात्र हे सरकार जाणार असल्याचे जगभर पसरलेले असल्याने आता आलो तर गुजरातमध्ये जावे लागेल. परंतु ‘इंडिया’चे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात हवे तिथे जाऊ शकतो, असा विचार करून त्यांनी बैठकीची तारीख पुढे ढकलली’, असा दावा ठाकरे यांनी केला.