श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आजच्या जगात लष्करी शक्तीचा वापर इतिहास जमा झाला आहे त्यामुळे तोडग्यासाठी याचा वापर करण्यात अर्थ नसल्याचे दलाई लामा यांनी जम्मू येथे माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.
भारत आणि चीनच्या सीमावादाबाबत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama) यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश भारत आणि चीन यांनी त्यांच्यामध्ये असलेले सीमावाद (India China Border) संवादातून सोडवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दलाई लामा एक महिन्यासाठी लेह लडाखच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले असून. तेथून ते लडाखला रवाना होणार आहे.
लामा म्हणाले की, भारत आणि चीन या दोन्ही शेजारील देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जगात शांतता आणि बंधुभावाची सर्वाधिक गरज आहे. जातीवाद ही लहान मनाच्या माणसांची निर्मिती असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी वर्णभेदाबाबत दक्षिण आफ्रिकेत अहिंसेचा संदेश दिल्याबद्दल महात्मा गांधींचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सावध राहण्याचाही संदेश दिला. कोरोनाने समाजाला खूप काही शिकवले आहे. असेही ते म्हणाले. २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर दलाई लामा प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष दृष्टीकोनातून बघितले जात आहे. २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील गलवान संघर्ष आणि त्यानंतर वाढलेल्या तणावानंतर दलाई लामा यांची ही पहिलीच लेह-लडाख भेट आहे.