वांद्रे – वरळी सी लिंकवर मोठा अपघात; ३ ठार ६ जखमी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास, टोलनाक्याच्या अगदी 100 मीटर आधी, वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारने मर्सिडीजला धडक दिली.

या धडकेनंतर टोल नाक्यावर उभ्या असलेल्या 6 गाड्या एकमेकांवर आदळल्या.

यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात कारने टोलच्या रांगेतील इतर अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा वाहनांची आपसात धडक होऊन त्यात बसलेले लोक जखमी झाले. तत्काळ सर्व जखमींना बाहेर काढून जवळच्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले.

इतर सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय म्हणाले, “आदळल्यानंतर एसयूव्ही कारचा वेग वाढला आणि ती टोल प्लाझावर दोन-तीन अन्य वाहनांना धडकली. या अपघातात एकूण सहा वाहनांचे नुकसान झाले. यात नऊ जण जखमी झाले, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. इतर सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.”

आरोपी इनोव्हा चालक ताब्यात, वाहनही जप्त

या अपघातात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी इनोव्हा चालकालाही किरकोळ दुखापत झाली. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, इनोव्हाही जप्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.