जळगाव ;- तळागाळातील विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सरकारने सरसकट मोफत शिक्षण द्यावे अशी अपेक्षा आ. सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली . ते आज जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, सध्याची राजकीय परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. जे राजकारण सुरु आहे, त्याचे परिणाम माझ्या पीढीसह येणाऱ्या पीढीलाही भोगावे लागतील अशी चिंता व्यक्त करतानाच वैचारिक व प्रशासकीय स्थैर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट मत आमदार सत्यजित तांबे व्यक्त केले.
कॉग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय फोडाफाडीचे जे राजकारण सुरु आहे, त्यावर तांबे यांनी प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते, आपण अर्थ काढतो तशी नसतेच. शेवटी कोणी कोणाला पकडून आणत नाही. ज्यांना यायचे ते सर्व विचार करुनच स्वत:पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात येतात. हे प्रकार आताच होतात असे नाही. याआधी देखील देशात व महाराष्ट्रात असे प्रयोग झालेले आहेत.
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करतानाच सरसकट सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळायला हवे असे मत तांबे यांनी व्यक्त केली.