जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेंतर्गत बाराशे कोटींच्या सामंजस्य करार; जिल्हयात अनेकांना मिळणार रोजगार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठीची पूर्व तयारी म्हणून पहिल्या जाणा-या जिल्हास्तरीय परिषदेंतर्गत लघु उद्योगा पासुन ते मोठ्या उद्योगापर्यंत परिषदेमध्ये एकुण 26 प्रस्तावीत उद्योगातुन रु. 1200 कोटी एवढ्या गुंतवणूकची सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणूकीतुन जळगांव जिल्हयात भविष्यात 3623 इतकी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. खा. उन्मेष पाटील, आ.राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे ही जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद दिनांक 07 मार्च 2024 रोजी संपन्न झाली.

ग्रामीण विकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सहकार्याने ही परिषद संपन्न झाली.

जळगांव जिल्हयातील सर्व गुंतवणूक करणा-या उद्योजकांचे अभिनंदन करून भविष्यामध्ये उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक सर्व सोईसुविधा शासनाकडून पुरविण्यासाठी पाठपुरावा करू असे खा. उन्मेष पाटील यांनी आश्वासित केले. उद्योगासाठी लागणा-या जागेची अडचण दूर करण्यासाठी शहरालगत जागेची पाहणी केली आहे. तसेच पाण्याची व्यवस्था राहावी यासाठी शेळगांव बॅरेज येथे उद्योगासाठी पाण्याचा कोटा राखीव ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन उद्योगांना पाणी टंचाई भासणार नाही. त्याच बरोबर कामगारांसाठी ईएसआयसी हॉस्पीटल मंजुर करुन त्यासंबधी पुढील कार्यवाही केली आहे. उद्योजकांना वेळ वाचावा यासाठी विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. लवकरच पुणे, हैद्राबाद व गोवा या शहरांसाठी विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. चाळीसगांव एमआयडीसी येथील पाण्याची समस्या सोडविण्याकरिता नवीन पाईप लाईन गिरणा धरणातून टाकण्यात येईल, याबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा असल्याचे नवीन व प्रस्तावित उद्योजकांना आर्थिक पतपुरवठा सुरळीत व लवकर करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना पाठपुरावा करण्याचा तसेच उद्योगांसाठी कोणतीही मदत आवश्यक असल्यास पुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन खा. पाटील यांनी दिले. यावेळी त्यांच्या हस्ते 26 उद्योजकांना सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.

आ.राजुमामा भोळे यांनी नवीन व प्रस्तावित उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. तसेच उपस्थित उद्योजकांनी जिल्हयात जास्तीत जास्त गुंतवणूक करुन जिल्हयाचा आर्थिक विकासात हातभार लावावा असे आवाहन करून जिल्हयातील नवयुवकांनी रोजगार मागणारा नव्हे तर रोजगार देणारा व्हावे असे नमुद केले. उद्योगासंदर्भातील कायदा व एक खिडकी योजनेसंदर्भात सहायक कामगार आयुक्त भास्कर मोराळे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. विकास गिते, केसीआयएल, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांनी इनोव्हेशन व स्टार्ट अप बाबत मार्गदर्शन केले. तसेच विवेक शिंदे यांनी GeM पोर्टलबाबत मार्गदर्शन केले. सदर परिषदेला अनिल गावीत, प्रादेशीक अधिकारी, एमआयडीसी, धुळे, सचिन देशमुख, विभागीय अधिकारी, बैंक ऑफ बडोदा, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी प्रणव कुमार झा, श्रीकांत झांबरे, नाबार्ड जिल्हा समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेचे प्रास्ताविक चेतन पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले. तसेच परिषदेचे आभार प्रदर्शन राजेंद्र डोंगरे, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.