नवी दिल्ली;- सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत सुरू असलेल्या लढाईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल, ईएमआय तेवढाच राहिल का त्यामध्ये कोणते बदल होतील याकडे सर्वांचं लक्ष लागू होतं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल न केल्याची माहिती दिली. त्यामुळे सामान्यांना तुर्तास दिलासा मिळणार आहे.
चलनविषयक धोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.आज पुन्हा एकदा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सध्या रेपो दर ६.५ टक्केच राहील. ६ सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय, त्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.