मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat Passed Away) यांचे सोमवारी वयाच्या ८५ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकराकाराच्या भूमिकेतून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले होते. त्यांनी आजवर अनेक नाटक सिनेमे आणि मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांनवर पाडली. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ या नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
तसेच त्यांनी ‘दामिनी’, ‘समांतर’, ‘झुंज’, ‘वादळवाट’, ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ आदी मराठी, तर ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी आणि इंग्रजी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मालिका आणि नाटकांमध्येही कामे केली होती. ‘ढाई आखड प्रेम के’, ‘चुप कोर्ट चालू है’ ही हिंदी नाटके तर ‘वख्त की रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ या हिंदी मालिकांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.