मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या देशासह राज्यात थंडीची लाट आहे. त्यातच काही दिवसांपासून हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 24 तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे. राज्यावर आलेल्या या अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.