वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदी करून व्यापार, उद्योग बंद पाडून कोट्यवधी लोकांचे रोजगार घालवले, दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांची फसवणूक केली आहे. अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, ६५ दिवसांपूर्वी मी कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. ही यात्रा आरएसएस, भाजप यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काढली आहे. अनेक जण उच्च शिक्षित असूनही त्यांना रोजगार नाही. त्यांना रोजगारासाठी भटकावे लागत आहे. देशात, राज्यात हीच स्थिती आहे. यापुढे पदवी मिळेल पण रोजगार नाही. या सरकारने शेतकरी, लहान व्यापारी यांना मारण्यासाठी नोटबंदी नावाने अस्त्र काढले होते. काळेधन संपेल असे स्वप्न दाखवले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी वाशीम शहरात पोहोचल्यानंतर सायंकाळी कॉर्नर सभा घेण्यात आली. त्यात राहुल गांधी बोलत होते.
मुंडांच्या विचारांवर आरएसएस, भाजपचे आक्रमण – राहुल बोराळा फाटा येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त कार्यक्रमात राहुल गांधींनी मार्गदर्शन केले. मुंडा इंग्रजांविरोधात लढले. आज त्यांच्या विचारांवर आरएसएस, भाजप आक्रमण करत आहे. तुम्ही वनवासी आहात, तुम्ही गावात नाही राहू शकत तुम्हाला जंगलात राहावे, असे भाजप सांगते, असे राहुल यांनी म्हटले.