नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाशिवरात्रीच्या (Mahashivaratri) प्रसादातून 125 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील राकसवाडे (Rakaswade) गावात घडली आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमळचा त्रास जाणवू लागला.
यानंतर सर्वांनी तपासणीसाठी डॉक्टरांना दाखविले असता, त्यांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 125 पैकी काहींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही 40 जणांवर रकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
राज्यासह देशभरात काल महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातील विविध भागात महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम करण्यात आले. तसेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते, पण महाशिवरात्रीच्या महाप्रसादातून भाविकांना विषबाधा झाल्याचे नंदुरबारमध्ये उघडकीस आले आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, विषबाधा झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदारांसह आरोग्य प्रशासन या घटनेवर संपूर्ण लक्ष देत तळ ठोकून आहे, तसेच विषबाधा झालेल्या भाविकांची अजून संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळं महाप्रसादाचा लाभ घेतलेल्यामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.