पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राज्यात पावसाचा तडाखा सुरु आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे. तर पावल्यात काहीजण पावसाळी सहलीला जाणं पसंत करतात. असेच काही तरुण पावसात फिरण्यासाठी गेले. मात्र त्यांची चारचाकी गाडी पुण्यातील नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली. अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. या अपघातात अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि तरुणी हरप्रित यांचा मृत्यू झाला. तर संकेत जोशी (26) रा. बाणेर असं अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलीसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृत व्यक्तीचा शोध सुरू आहे.