नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. याबाबतची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेता यांच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे.
अरुण गोयल यांनी नऊ मार्च रोजी आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता. काही खासजी कारणासाठी त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातय. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयुक्ताच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या.
त्रिसदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी समितीच्या या आधीही बैठका झाल्या होत्या. आज दोन नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, अधीर रंजन चौधरी यांनी समितीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या समावेशावरुन टीका केली आहे.