मोदींची मोठी घोषणा, चांद्रयान ३ उतरलं त्या जागेचं नामकरण

0

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चांद्रयान ३ मोहिम यशस्वी करून भारताने इतिहास रचला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. भल्या सकाळी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी वैज्ञानिकाशी संवाद साधला असून त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही केलं. तसेच  हे मानवतेचं यश असून यामुळे आपलं मिशन ज्या क्षेत्राला एक्स्प्लोर करले, तिथे सर्व देशांच्या मून मिशनसाठी नवे रस्ते निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करत ज्या जागेवर मून लँडिंग झालं आहे, त्या जागेचं नामकरणही करण्यात आल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

“स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चांद्रयान उतरलं आहे, भारताने त्या जागेच्या नामकरणाचा निर्णय घेतला आहे. ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे, त्या पाँईटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाईल”, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

शिवशक्ती पाँइंट 

मोदी म्हणाले की,  “शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे”. “ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे”, असंही मोदी म्हणाले.

तिरंगा पाँइंट 

तसेच मोदी म्हणाले की, “आणखी एक नामकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान २ चंद्रापर्यंत पोहोचलं होतं, तेव्हा प्रस्ताव होता की त्या जागेचं नाव ठरवलं जाईल, पण त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की जेव्हा चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल तेव्हा आम्ही दोन्ही पाँईंटचं नाव एकत्र ठेवू. आज मला वाटतं की जेव्हा हरघर तिरंगा, हर मन तिरंगा आणि चंद्रावरही तिरंगा आहे, तर तिरंगाशिवाय चांद्रयान २ शी संबंधित त्या जागेला दुसरं काय नाव देता येऊ शकतं? त्यामुळे चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे”,  “हा तिरंगा पाँइंट आपल्याला शिकवण देईल की कोणतंही अपयश शेवटचं नसतं. जर दृढ इच्छाशक्ती असेल तर यश प्राप्त होतंच. म्हणजेच, चांद्रयान २ चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा नावाने ओळखली जाईल. तर, ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चे मून लँडर पोहोचलं आहे ती जागा आजपासून शिवशक्ती पाँइंट म्हणून ओळखले जाणार आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.