जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोसमी पावसाला आता परतीचे वेध आता लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतातील काही राज्यांतून मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यांनतर तो महाराष्ट्रातून आठ ते दहा दिवसांनी माघारी फिरू शकतो.
सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस
जळगावसह जिल्ह्यातील अनेक भागांना काल जोरदार पावसाने झोडपले. यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढल्याने अनेक दरवाजे उघडण्यात आले. धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुढील तीन ते चार दिवस प्रामुख्याने विदर्भात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आदी भागांत २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कमी राहील.