क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान संघाशी होता. अफगाणिस्तान संघाच्या डावात पावसाने हजेरी लावल्याने निर्धारित वेळेत खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. यानंतर, भारताच्या क्रमवारीत चांगले असल्यामुळे सुवर्णपदक देण्याचा निर्णय सामना अधिकाऱ्यांनी घेतला. तर अफगाणिस्तान संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सुवर्णपदकाच्या सामन्यात सतत पावसाची सावली दिसत होती. यामुळे सामना सुमारे 1 तास उशिराने सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाण संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती ज्यात त्यांनी अवघ्या 12 धावांवर त्यांचे पहिले 3 विकेट गमावले होते. येथून शहिदुल्ला कमालने एका टोकाकडून डाव सांभाळत धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला.
अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 5 विकेट गमावून 112 धावा केल्या असताना पावसामुळे सामना थांबवावा लागला. मात्र, सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि भारतीय संघाला त्याच्या चांगल्या मानांकनानुसार सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष क्रिकेट संघातील युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी या स्पर्धेत सर्वाधिक 100 धावा फटकावल्या, तर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, आर साई किशोरने भारताकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.