जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र्राला अजून तरी थंडीपासून सुटका नाहीय. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात प्रचंड थंडीचा कडाका वाढला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली गेलंय.तर शुक्रवारी जळगावात सर्वात कमी तापमान 8.8 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. निफाडसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे. महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. प्रदेशातील अनेक भागांमध्ये दाट धुकं पडलं आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अधिक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्री सेल्सियसच्या जवळपास होतं. हवामान विभागाने अंदाज वर्तवला की, राज्यात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहू शकते.
आणखी दोन दिवस थंडी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी आणखी दोन दिवस थंडी कायम राहील. पुणे आणि मुंबईत देखील वातावरण थंडच राहणारआहे. शुक्रवारी पुण्यातील पारा हा 10 डिग्री सेल्सियपर्यंत आला होता. मुंबईच्या सांताक्रूझ हवामान केंद्राने शुक्रवारी किमान तापमान 16.3 डिग्री सेल्सियसच्या जवळपास नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. पुणे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ आणि नागपूरात सर्वाधिक थंडी पडतेय. शुक्रवारी नाशकातील तापमान 9.8 डिग्री सेल्सियपर्यंत कोसळलं. थंडीसोबतच दाट धुक्यामुळेही लोक हैराण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात जास्त थंडी पडली आहे.
तापमानात घट कायम
तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारपासून पुढील दोन दिवसांपर्यंत आभाळ स्वच्छ राहणार आहे आणि कमाल तापमान 30 डिग्री सेल्सियच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. राज्यभरात पुढील दोन दिवसांपर्यंत वातावरण थंड राहण्याची अपेक्षा आहे. पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळातील तापमान 10 डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता आहे.