मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेल्यास महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही, असे वादग्रस्त विधान करून काही दिवसच उलटलेत तेवढ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, २०१४ नंतर विदेशात आता भारतीयांचा सन्मान वाढला आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. ‘मोदी वीस वीस तास काम करतात. आपल्याला असं नेतृत्त्व मिळालं आहे, की दुनियेतील लोकं भारतीयांचा सन्मान करताय. त्यांच्या पाठीवर कौतुकात थाप पडते’, देशाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही, यांच्या पद्धती खराब, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. परंतु, आमचा इतिहास गौरवशाली आहे. अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटीशांनाही या देशाने धुळ चारली आहे. आज मोदींमुळे देश जागृत होत आहे. देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर विद्यापीठाने सक्षम भारताच्या उभारणीसाठी सहयोग करावे असे आवाहनही कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारींच्या याच विधानावर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. “राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही,” असं रोहित पवार ट्विटरवरुन म्हणाले आहेत.
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022
“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे,” असं रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.
तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022