नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वेकडूनही प्रवाशांवर लादण्यात आलेले निर्बंध कमी केले जात आहेत. रेल्वेने बुधवारी तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय घेवून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅड्रेस (Destination Address) टाकण्याची गरज नाही. तिकीट बुक करताना आता IRCTC प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन अॅड्रेस विचारणार नाही.
कोरोना महामारिच्या काळात रूग्णांना ट्रेस करण्यासाठी डेस्टिनेशन अॅड्रेसची मदत होत होती. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना डेस्टिनेशन अॅड्रेस टाकणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, आता कोरोना निर्बंध शिथील करण्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणादरम्यान डेस्टिनेशन अॅड्रेस टाकण्याची तरतूद रद्द केली आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महामारी काळात लादलेले अनेक निर्बंध आता हळूहळू शिथील करण्यात येत असून देशात रेल्वे सुविधा पूर्ववत होत आहे.