लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून आज गणित विषयाचा पेपर होता. मात्र हा पेपर फुटला. १० वाजताच हा पेपर उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा पेपर अहमदनगर जिल्ह्यात नेमकं कोणत्या केंद्रावर फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत.
विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याची घटना घडली. याप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाटली जाते. त्यानुसार रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका १०.२० वाजता वाटण्यात आली. मात्र, एका विद्यार्थिनीला येण्यास उशीर झाला होता. यावेळी तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला.
दरम्यान याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की, बारावी रसायनशास्त्रचा हा संपूर्ण पेपर फुटला नाही. त्यातील काही भाग त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये आढळून आला. त्या विद्यार्थिनीच्या चॅटनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.