लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवरून निर्माण झालेल्या कमी दाबाची पट्टी पुढे सरकत असून, आज सायंकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा एकदा बसरण्याची शक्यता आहे.
बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येणाऱ्या पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
2 ऑगस्ट बुधवार रोजी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3 ऑगस्ट गुरुवार रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.