जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघातील (Jalgaon Dudh Sangh) कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली.
खडसेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. दोन व्यक्ती राज्यकारभार पाहत आहेत, हे असं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर व्हायला पाहिजे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावे. राज्यात अजूनही पालकमंत्री नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास काही प्रमाणात थांबला असून विकास कामांना वेग दिला पाहिजे.
बडतर्फ कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून कारवाई केली. जिल्हा दूध संघात वेळोवेळी ऑडिट झालं आहे. या लेखा परीक्षणात कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाहीत. आताच सरकारला कसं काय यात भ्रष्टाचार दिसला आणि हे मंडळ बरखास्त केलं, हे सर्व अनाकलनीय आणि राजकीय द्वेषापोटी आणि सूड भावनेने केलेली कारवाई आहे.
त्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी जसे आदेश काढलेले आहेत त्यात गिरीश महाजन आणि एन. जी. पाटील यांचं नाव आहे. कायद्यानुसार नियमानुसार ही कारवाई झालेली नाही. जर तुम्हाला संचालक मंडळ बरखास्त करायचं होतं. तर आधी भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध व्हायला पाहिजे होते. किमान भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे होती. एक रुपयाचाही भ्रष्टाचार तुम्ही दाखवू शकलेले नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया झालेली नसतांना कारवाई केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी याचिका आम्ही उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. सोमवारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
हे संचालक मंडळ सर्व पक्षीय होतं, त्यात सर्व अनुभवी होते. जरी दूध संघ आमच्या सहकाऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. तरी या दूध संघाच्या कारभारामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही. सात वर्षात फक्त दोन वेळेस मी कार्यक्रमाला दूध संघात गेलो. याशिवाय मी तेथे पाय सुद्धा ठेवला नाहीय. इतकी स्वायत्तता आणि स्वतंत्र त्यांना दिलं होतं. आता तर या सर्वांना दूध संघाच्या भरभराटीशी काही देणं घेणं नाही. दूध संघामधील लोणी, तूप, ताक, दही याकडे त्यांच्या नजरा आहे. असे घणाघाती आरोप एकनाथराव खडसेंनी केले आहे.