लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि यादरम्यान कारच्या काच फुटल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवार रोजी त्यांच्या गादीवर हा हल्ला झाला. या घटनेत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर कोणाला दुखापत झाली आहे का? सध्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
एका वृत्तवाहिनीवरील बातमीनुसार, पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अराजकवादी घटकांनी हा हल्ला केला आणि या अराजकतावादी घटकांचा सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
बिहारमधील कटिहार येथून निघून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा आज सकाळी ११.३० च्या सुमारास मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून हळूहळू जात असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलच्या (एसयूव्ही) छतावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बसलेले दिसले.
१४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूर येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “भारत जोडो न्याय यात्रा” सुरु झाली. यात्रेदरम्यान ६७ दिवसांत ६,७१३ किमीचे अंतर पार केले जाणार आहे. जे १५ राज्यांमधील ११० जिल्ह्यातून २० मार्चला मुंबईत संपेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रवास काँग्रेस पक्षासाठी मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. मात्र, याचा संघाला किती फायदा होईल? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.