नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून शपथ घेतली आहे. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) कामकाज पाहणार आहेत. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळं निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज (९ ऑक्टोबर) राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली.
Justice DY Chandrachud formally takes oath as the new Chief Justice of India pic.twitter.com/JY0xdSrLEB
— ANI (@ANI) November 9, 2022
सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. लळीत यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश लाभले आहेत. चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूडदेखील सरन्यायाधीशपदी तब्बल ७ वर्ष ४ महिने अशा प्रदीर्घ काळासाठी कार्यरत होते. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.
त्यांच्या आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या. वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपद भूषवले. वडिलांचा वारसा चालवत न्या. धनंजय यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. चंद्रचूड यांनी शबरीमाल, समलैंगिकता, आधार व अयोध्या प्रकरणांसह अनेक महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या न्यायनिवाड्यांद्वारे न्यायदान करण्याबरोबरच कायद्याच्या विद्यार्थ्यांना अध्यापन, महाराष्ट्रातील न्यायाधीशांना प्रशिक्षण, विधी व न्यायाशी संबंधित लेखन आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याने असे विविधांगी काम त्यांनी केले आहे.