क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. भारताला हरवून एकदिवसीय विश्वविजेते ठरलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत. तर विश्वचषकासाठी टीम इंडियाचा भाग असलेले इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरच्या आगमनानंतर रुतुराजच्या जागी तो संघाचा उपकर्णधार असेल. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, ज्याने यावर्षी अनेक टी-20 मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, तो घोट्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तर संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही.
यासोबतच बीसीसीआयने मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांचे ठिकाणही बदलले आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने आता रायपूर आणि बेंगळुरू येथे होणार आहेत. यापूर्वी हे सामने नागपूर आणि हैदराबाद येथे होणार होते. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आधीच संघ जाहीर केला आहे.
संघ खालीलप्रमाणे आहे…
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.