जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राज्यात सध्या अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मागण्यांसाठी अनेक समाज व अनेक संघटना आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यात मुख्यत्वे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे धनगर समाजही आरक्षणासाठी आपले आंदोलन तीव्र करत आहे. अशातच आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला हिंसक वळण आले. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे.
जालन्यात गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने मोर्चेकरांनी गोंधळ घातला. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव सहभागी झाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना अडवण्यात आले. ज्यामुळे संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली.