महाविकासआघाडीत ‘एक्स्चेंज ऑफर’!

0

केंद्रातले मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा ‘त्याग’ करणार?

मुंबई ;- महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली. ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली. हा विषय दिल्लीपर्यंत गेला. यानंतर आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसार्इंना उमेदवारी जाहीर केली आहे. देसाई राज्यसभेचे खासदार आहेत. पक्षफुटीनंतरही सोबत राहिलेल्या देसार्इंना जनतेतून निवडून आणण्यासाठी ठाकरेंनी त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं आहे. वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून लढण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच दिल्लीवारीही केली. त्यांनी दक्षिण मध्य मुंबईबद्दल पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याचे समजते. ही जागा काँग्रेसला सोडून त्याबदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर मुंबईची जागा दिली जाऊ शकते. इथून ठाकरेसेनेकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल रिंगणात आहेत. विनोद घोसाळकर दहिसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

अनिल देसाई पुन्हा त्याग करणार?

ठाकरेंचे निष्ठांवत अशी ओळख असलेल्या अनिल देसार्इंना मोदी सरकार 1 मध्ये मंत्रिपद मिळणार होतं. त्यासाठी ते नोव्हेंबर 2014 मध्ये दिल्लीला गेले होते. विमानतळावरुन ते मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पोहोचणार होते. पण राज्यात सत्तावाटपावरुन पेच निर्माण झाला. त्यामुळे शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी निघालेल्या देसार्इंना ठाकरेंनी माघारी बोलावले. त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली.

Leave A Reply

Your email address will not be published.