मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना देखील धक्का बसला आहे. अशातच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अजित पवार यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांच्याविरोधातील कारवाई काही थांबणार नाही’ असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, ‘अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून मला सुध्दा धक्का बसला. राष्ट्रवादीत सुरु असलेला तणाव आणि त्यांच्या कुटुंबात सुरु असलेला अंतर्गत कलह या कारणांमुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असू शकतो’, असे महाजनांनी सांगितले. ‘अजित पवारांनी राजीनामा दिला हे त्यांच्या कुटुंबाला माहित नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेला कौटुंबिक कलह दिसून येत आहे.’ असे देखील महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा का दिला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे.