पुणे: पुण्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुण्यातील मृतांची संख्या २३ वर पोहोचली असून, अद्याप आठ जण बेपत्ता आहेत.
शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर नऱ्हे येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये साठलेले पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहून गेलेल्या मुकेश गाडीलोहार या युवकाचा आणि जांभूळवाडी येथे कारमधून वाहून गेलेल्या तिघांपैकी सूरज उर्फ बाबू वाडकर यांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या हाती लागले. यासह खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांचा आणि खडकवासला येथे अज्ञात युवकाचा असे एकूण पाच मृतदेह शुक्रवारी आढळून आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या २३ वर पोहचली आहे.
खडकवासला येथे आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मृतांचा आकडा वाढत असून, बेपत्ता झालेल्यांबाबत प्रशासनाकडे वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. खेडशिवापूर येथील करमअली दुर्वेश दर्ग्याच्या मागील ओढ्यातून सूर्यवंशी कुटुंबातील तिघेजण वाहून गेले होते. त्यापैकी गौरी सूर्यवंशी (वय १४) यांचा मृतदेह गुरुवारी आढळून आला. आरती यांचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला असून, त्यांचे पती श्याम अद्याप बेपत्ता आहेत. या कुटुंबाचा शोध घेत असताना सुवर्ण जाधव यांचा मृतदेह आढळून आला.