भुसावळ , प्रतिनिधी
दिनांक ९ जुलैच्या मध्यरात्री पाइपलाइन फुटून जांभूळ नदीमध्ये पाण्याबरोबर हजारो क्युबिक मीटर राख जमा होऊन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र वीजनिर्मितीच्या बाबतीत नवीन उच्चांक साधत असताना प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे .
दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारी राख ही वेल्हाळे फॉरेस्टमध्ये तयार करण्यात आलेल्या राखेच्या बंड मध्ये सोडण्यात येते. 1985 पासून निरंतर राखेचे उत्सर्जन वेल्हाळे शिवारात तयार करण्यात आलेल्या राखेच्या बंडमध्ये करण्यात येत आहे. यात नंबर १, २, ३ अशी निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी गेल्या तीस वर्षांमध्ये बंड नंबर एक व दोन हे पूर्णपणे राखेने भरून बंद करण्यात येऊन आता बंड नंबर 3 मध्ये राख सोडली जात असताना त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
शासनाच्या प्रदूषणाच्या बाबतीत नियम व अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन किंवा त्यासाठी त्यांच्या पर्यावरण विभाग व स्थापत्य विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे वेल्हाळे परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा त्रास होत असून जनता आरोग्यविषयक रोगाने त्रस्त आहे.
सन 2009 पासून वेल्हाळे परिसरात राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणा बाबतीत आदी जनता, मच्छिमार सोसायटी, वेल्हाळे ग्रामपंचायत, संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती वेल्हाळे , जाडगाव, मन्यार खेडे यांच्यामार्फत वेळोवेळी दीपनगर औष्णिक विद्युत प्रशासनाच्या सदर बाब आंदोलन करून निदर्शनात आणून दिली असून सुद्धा आज पर्यंत लेखी आश्वासना पलीकडे काहीही करण्यात आले नाही. नदी तलावामध्ये आलेल्या राखी या संदर्भात मुख्य अभियंता यांना भेटले असता फंड नाही , आतीलच काम बंद आहे, नंतर बघू असे उडवाउडवीचे उत्तर देऊन प्रकल्प मध्ये गरज नसलेली कामे मात्र वरिष्ठ कार्यालयाकडे कामाचे नियोजन करून निधी मागून केले जातात. मग त्यामध्ये सुशोभीकरण असेल प्रवेश द्वार असेल कार्यालयाच्या व कॉलनीमधील रंगरंगोटी असेल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते, मात्र राखी पासून होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र डोळे मिटून पाहिले जाते.
या प्रदूषणात आत्तापर्यंत भोगावती नदीमार्गे तापी नदीत होणारे प्रदूषण, राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईन फुटून किंवा चोकप काढून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील नैसर्गिक एक साधन संपत्तीचा विनाश झाला आहे. राखेची पाईपलाईन फुटून झालेले राखेचे प्रदूषण व राख ही पाऊस सुरू होण्याच्या आधी उचलण्यात यायला पाहिजे. याबाबत मुख्य अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दाखवले नाही किंवा समाधान कारक उत्तर दिले नाही. याचाच अर्थ शासनाने पर्यावरण व प्रदूषण विषयक नियमांची पायमल्ली करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे असे दिसून येते.
सदर प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर प्रदूषणाची दखल औष्णिक विद्युत केंद्र व प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ न घेतल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, ऊर्जामंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालक मंत्री यांच्याकडे करण्यात येईल.