मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आज अखेर मुक्ताईनगर आगारातील चालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. नोकरीवरून काढून टाकतील या भीतीने व नैराश्यातून कारवाईच्या भीतीने हृदय विकाराचा झटका येऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मयताच्या अंत्यविधीसाठी तातडीची मदत देण्यात आली.
मुक्ताईनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले जुने गावातील जितेंद्र गोपाळ नाथजोगी (वय ४५) मुक्ताईनगर येथील एसटीमध्ये चालक म्हणुन कार्यरत होते. त्यांचे १७ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मुक्ताईनगर येथील जुने गावातील जोगीवाडा येथे राहते घरी मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, १ बहिण, दोन मुले असा परिवार आहे.
अंत्यविधीसाठी तातडीची मदत
दुपारी १२ वाजता मुक्ताईनगर एसटी आगारातील विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक, वाहक यांनी घरी येत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. नंतर एसटीकडुन कुटुंबियांना पाच हजाराची मदत देण्यात आली. प्रसंगी आगारप्रमुख संदीप साठे, पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी सात्वन केले.
अतिशय त्रोटक पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा असणारे व राज्य परिवहन महामंडळाला नफा मिळवून देणारे राज्य परिवहन महामंडळाचे चालक वाहक हे आपल्या मागणीसाठी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बेमुदत संपावर आहेत. त्यावर शासन तोडगा काढत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच काहींनी कर्ज घेतलेले आहेत तर ते कर्ज फेडावे कसे आपले कुटुंबाचा गाडा तसेच पालनपोषण करावे कसे असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत.
अशा परिस्थितीत आतापर्यंत 50 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यातच मुक्ताईनगर येथील चालकाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाचा आधार हरवल्याने त्यांचा संसार चालणार कसा त्यांना आधार कोण देणार असा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे आधीच संप पगार नाही त्यातही कुटुंबाचा असलेला आधार हरवल्याने कुटुंबाने आता जगायचे कसे हा प्रश्न कुटुंबाला सतावत आहे याकडे शासनाने त्वरित लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.