जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे जळगावकर त्रस्त झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या व्हायरलच्या रुग्णांनमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. १० पैकी आठ मुलांना सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे, अंगदुखी आदी लक्षणे आढळून येत आहेत. यात गोवर, फ्लू, राहेनो, अॅडिनो व्हायरसची लागण असू शकते; मात्र उपचाराअंती सर्वजण बरे होत आहेत. पालकांनी उपचार व योग्य खबरदारी घेतल्यास विषाणूपासून बचाव होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अॅडिनो, इन्फ्लुएंझा, राहेनोसारख्या विषाणूंमुळे मुलांना आजार वेदनादायी ठरत आहे. पाच वर्षांची बालके जास्त बाधित आहेत. लसीकरण झालेल्यांना विषाणूपासून कमी त्रास होताना दिसत आहे.
आजारी मुलांना शाळेत अजिबात पाठवू नका
सध्या शाळांमध्ये स्नेहसंमेलने सुरू आहेत. तसेच पालकांबरोबर मुले गर्दीत गेल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे आजार पसरत आहेत. बरीच मुले दोन ते तीनवेळा आजार पडतात. ते वेगवेगळ्या विषाणूचा संपर्कात आल्यामुळे होत आहे. त्यामुळे जी मुले आजारी आहेत, त्यांना शाळेत पाठवू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.