वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शेती शिवारात गेल्या दोन दिवसात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आयुध निर्माणी परिसरातील जंगल भागासह आता अंजनसोंडा शेती शिवारात बिबट्याचा शिरकाव झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून शेतातील गोठ्यात राहणाऱ्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढवत दोन कुत्री बिबट्याने फस्त केली आहे. असाच प्रकार सोमवारच्या रात्री गोविंदा राणे यांच्या गोठ्यातील कुत्र्याचा फडशा पाडल्याचे मंगळवारी सकाळी समोर आले. यामुळे या परिसरात असलेल्या शेती मध्ये पिकांना पाणी देण्यासाठी किंवा शेती कामाला जाण्यास शेतकरी धाडस करीत नसून त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी व शेतकरी वर्गातून होत आहे.