महाड, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आज कोकणातील महाड इथं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणा आणि भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अबकी बार भाजप तडीपार, असा नारा देत उद्धव ठाकरे यांनी यलगार केला आहे.
आम्ही शिवसेना सोडतोय कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व काय आहे ते तुम्ही समजून घ्या. जे मला शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी हिंदुत्व सांगितलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही. अनेकदा मला साहेबांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडणारा नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे. भाजपकडं कुठलं हिंदुत्व आहे, गोमुत्रधारी हिंदुत्व आहे त्यांचं मी हे नवं नामकरण केलं आहे.
त्याच बरोबर त्यांनी भाजपचा समाचार घेत म्हटलं कि, कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? जर काँग्रेस बोलली असेल की, आम्ही बजरंग दलावरती बंदी आणू, म्हणून तुम्हाला बजरंग बली आठवत असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला निघाला आहात, तुमचं काय करायचं ते पहिलं सांगा, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेतून भाजपला केला आहे.
शिवसेना पक्षाचं नाव तुम्ही माझ्याकडून काढून घेतलं. प्रभुरामचंद्रांचा धनुष्यबाण तुम्ही गद्दारांच्या हाती दिला, हा छत्रपतींचा अपमान नाहीये का? असा संतप्त सवालही त्यांनी भाजपला विचारला. जर भाजप लोकांना आवाहन करत असेल की, तुम्ही बजरंग बली की जय म्हणा, असं म्हणत लोकांना मतदान करायला लावत असतील, तर मी तुम्हाला सांगतो यापुढे जय भवानी जय शिवाजी म्हणून तुम्ही भाजपला तडीपार करा, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला तडीपार करा, असा नारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी देखील मिळत नसेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना (शिंदे गटाला) दिले. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत. याचं आश्चर्य वाटत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.