नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
“मोदी सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये, ट्रक चालकांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे”, अशी मागणी ट्रक मालक संघटनेनी केली आहे. देशभरातील ट्रक चालकांच्या संपाला ट्रक मालक संघटनेनी पांठिबा दिला आहे. नव्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्रक चालकांनी हा संप पुकारला आहे. नवा ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करण्याची मागणी ट्रक चालकांनी केली आहे. ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्यभरात बैठका सुरु आहेत. देशात सुरु असलेल्या ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ट्रक मालक संघटनेने पत्रकार परिषद घेतली. या संघटनेचे अध्यक्ष मलकित सिंग यांनी संपावर भूमिका स्पष्ट केली.
मलकित सिंग म्हणाले, आम्ही या संपाची दखल घेतली. आम्ही २७ तारखेला सर्वांना या कायद्यातील कमतरता लक्षात आणून दिल्या. गृहमंत्री, प्रधानमंत्री, मंत्री, राज्यपाल यांना लिहून आमच्या तक्रारी कळवल्या. आम्ही चालकांच्या सोबत आहोत. चालक हैं, तो मालक हैं, मालक हैं, तो चालक हैं. ट्रक चालकांचा संप देशासाठी आणि आमच्यासाठी ठीक नाही.
ट्रक चालकांच्या मागणीवर निर्णय घ्यायला उशीर करू नका. जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती हाताबाहेर जाईल. आम्ही संयमाने काम करत आहे. आगीत तेल ओतण्याची आमची भूमिका नाही. हा कायदा रद्द करावा लागेल. देशातील अशीच स्थिती कायम राहिली तर कठीण होईल, असेही ते म्हणाले.
ट्रक चालक सोडून गेले तर परत आणणे कठीण असेल. सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. सरकारने तातडीने कायदे रद्द करण्याची घोषणा करावी. आज संध्याकळपर्यंत यावर उपाय शोधला जाईल, अशी आम्हाला आशा आहे. सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये. या प्रकरणात जास्त वेळ वाया घालवू नका, असे मलकित सिंग म्हणाले.