मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइनद्वारे जाहीर झाला. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती.
तसेच संपूर्ण राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीच्या विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी आणि दहावीच्या विषयाची परीक्षा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तसेच २८ जुलै रोजी असलेल्या दहावीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन:श्च फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणारी अंतिम परीक्षा देता येणार आहे.