“आपल्याला शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात. जर शेतकरी दु:खी असतील तर ग्राहक ही निरोगी राहू शकत नाही” श्री श्री रविशंकर यांचे आवाहन

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एका ऐतिहासिक मेळाव्यात, १०,००० शेतकरी नैसर्गिक शेतीचे यश साजरे करण्यासाठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभावाबद्दल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आले.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शेतकरी मेळाव्यात १०,००० शेतकरी, ५०० सरपंच आणि गावांचे प्रमुख यांचा ऐतिहासिक मेळावा पाहायला मिळाला, ज्यात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे आपल्या जीवनात बदल घडला आणि समृद्धी आली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रातील संभाजी नगर जिल्ह्यातील सुमारे १०,००० हून अधिक आदिवासी शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ही या प्रकल्पाचा उल्लेख केला गेला होता.

जागतिक अध्यात्मिक नेते आणि मानवतावादी, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या समस्येचे निराकरण करण्याची निकड व्यक्त केली. “आपल्याला शेतकरी आत्महत्या थांबवायला हव्यात. इथे ५०० सरपंच उपस्थित आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या गावात एकही शेतकरी निराशेने ग्रस्त होणार नाही याची खात्री करून घ्या. मी महाराष्ट्र सरकारलाही आवाहन करतो की यापुढे  शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याबद्दल काळजी घ्यावी. यासाठी आमचे स्वयंसेवक तुमच्यासोबत काम करतील. जर तुम्हाला एक जरी शेतकरी दुःखी किंवा तणावग्रस्त दिसला, तर थांबा आणि त्याच्याशी बोला. त्याला काय त्रास होतोय ते विचारा. आम्ही शेतकऱ्यांना सांगायला हवे, जर तुम्हाला तुमचे जीवन द्यायचे असेल तर ते देशाच्या कल्याणासाठी अर्पण करा. आर्ट ऑफ लिव्हिंग नेमके हेच करते- मनातल्या नकारात्मकतेचे विष काढून टाकण्यास मदत करते आणि जीवनाला नव्या हेतूसाठी प्रेरित करते.”  गुरुदेवांनी गावातील प्रमुखांना आणि पालकांना युवक आणि मुले व्यसन आणि दारूपासून दूर राहतील याची काळजी घेण्याचे आवाहन केले.  गुरुदेवांनी निदर्शनास आणून दिले की जर शेतकरी दु:खी असेल तर त्याने उत्पादित केलेल्या अन्नाचा उपभोक्ताही निरोगी राहणार नाही. “संत तुकाराम आणि नामदेव यांच्या काळात जशी भक्ती आणि आनंदाची लहर होती, तशी आता वाढवायला हवी.” असेही ते म्हणाले.

राज्यात सर्वांगीण ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या आपल्या प्रयत्नाचा भाग म्हणून, आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्र सरकारसोबत नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत, महाराष्ट्रात १३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत असून त्याकरिता हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. आणि ते एवढ्यावरच थांबणार नाहीत, तर ते त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून  देत आहेत, ज्यामुळे मध्यस्थ दलालांना वगळले जाईल आणि परिणामी शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल.

आजच्या कार्यक्रमात किसान बास्केट लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना बास्केटची निर्मिती करण्यासाठी सदस्यत्व घेऊन थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल.

नैसर्गिक शेतीचे अनेकविध फायदे आहेत. महाराष्ट्रातले शेतकरी किशोर थोरात सांगतात, “गुरुदेवांच्या प्रेरणेने, मी गेली सात वर्षे नैसर्गिक शेती करत आहे. मिश्र पिके घेऊन,  नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळे आणि भाज्यांचे दर आता मी ठरवतो. एक एकर जमिनीत मी २८ प्रकारची फळे आणि ४० प्रकारच्या भाज्या पिकवतो. मला वर्षाला सुमारे ७ लाख रुपये नफा मिळतो.”  नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतलेले आणखी एक शेतकरी, फलटण जवळील धुमाळवाडी गावातील दत्तात्रय डुमर, पिकवलेली फळे संपूर्ण भारत, दुबई आणि यूकेमध्ये विकत आहेत.  तसेच ते सर्व सेंद्रिय उत्पादन असल्याने रासायनिक खतांवर पैसा वाया जात नाही.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, लोकप्रिय मराठी अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते, सयाजी शिंदे यांनी सांगितले,  “आज गुरुदेवांच्या उपस्थितीत मी अनुभवले की जेव्हा आपण सकारात्मक विचारसरणीने काम करतो तेव्हा काम कसे यशस्वीपणे होते.” त्यांनी प्रत्येकाला किमान ५०० झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले. “केवळ झाडे सेलिब्रिटी दर्जाला पात्र आहेत.” असेही ते म्हणाले.

हिवरे बाजारचे सरपंच व पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्री. पोपटराव पवार यांनीही माती निरोगी ठेवण्याची गरज सांगितली. ते म्हणाले, “केवळ रसायनमुक्त शेतीमुळेच आपल्या भावी पिढ्या निरोगी राहतील.  त्रेतायुगात आपल्याला मिळालेले रामराज्य हवे असेल तर आपल्याला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी करावी लागेल आणि सर्वत्र नैसर्गिक शेती करावी लागेल.”

आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार-मनरेगा यांनी जलतारा प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी सामंजस्य करार केला.  यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री मंगेश चिवटे, महाराष्ट्र मनरेगा विभागाचे ओएसडी श्री राहुल गेठे, तसेच रोहयो – मनरेगा विभागाच्या उप सचिव श्रीमती संजना घोपडे उपस्थित होत्या.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जलतारा प्रकल्पांतर्गत ४५,५०० जलतारा रिचार्ज स्ट्रक्चर्स ११५ गावांमध्ये केवळ २ वर्षात बांधून लाखो लोकांना फायदा झाला आहे.  जलतारा रिचार्ज स्ट्रक्चर्स रेती, बारीक गिट्टी आणि खडकांनी भरलेल्या ४x ४x६ आकाराच्या रिचार्ज स्ट्रक्चर्स आहेत, ज्यामुळे पाणी वाहते, झिरपते आणि भूजलाचे पुनर्भरण होते, ज्यामुळे पूर रोखला जातो, धूप कमी होते आणि जमिनीचे पोषण राखत  शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होते. पाण्याच्या पातळीत सरासरी १४ फुटांनी सुधारणा झाली आहे;  शेतकऱ्यांचे उत्पन्न सरासरी १२०% पेक्षा जास्त वाढले आहे आणि पीक उत्पादनात ४२% पेक्षा जास्त सुधारणा झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.