मुंबई, लक्षही न्यूज नेटवर्क
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर काही लोंकानी हल्ला केला. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या हल्लाप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन थेट ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. घटनेनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात (Ashok Kharat) हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झालं आहे.संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने अशोक खरातने हा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.