जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड केली आहे. मंगळवारच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत. मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपने दोन उपमुख्यमंत्री केले आहेत. दिया कुमारी सिंह आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. तर वासुदेव देवनानी यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून दिया कुमारी विजयी झाल्या आहेत. तर प्रेमचंद बैरवा जयपूर जिल्ह्यातील दुडू मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
#WATCH | Rajasthan CM-designate Bhajanlal Sharma garlanded after BJP picks him for the CM post, in Jaipur pic.twitter.com/rcwibk9fDd
— ANI (@ANI) December 12, 2023
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते 4 वेळा सरचिटणीस राहिले आहेत आणि RSS-ABVP शी संबंधित आहेत. तो आरएसएसच्या फेवरेट लिस्टमध्ये आहेत. भाजपने सांगानेरचे विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट रद्द करून भजनलाल शर्मा यांना तिकीट दिले होते. 56 वर्षीय भजनलाल शर्मा हे भरतपूरचे रहिवासी आहेत. बाहेरचे असल्याचा आरोप असतानाही ते सांगानेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी या जागेवरून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला.
बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांनी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी बैठकीपूर्वीच वसुंधरा राजे यांची मनधरणी करून नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा प्रस्ताव देण्यास पटवून दिले.