मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
खासगी लक्झरी बस मालकांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्याकरता भरारी पथकांच्या माध्यमातून बसची पाहणी करण्यात येईल. तसेच प्रवाशांकडून अवाजवी पैसे घेणाऱ्या ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिले. वसई(Vasai), विरार (Virar) ते डहाणूपर्यंतच्या उपनगरातील कोकणवासीय एप्रिल-मे, होळी, महाशिवरात्री आणि गणेशोत्सवाच्या काळात विरारहून कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
अशा वेळी कोकणातील चाकरमानी विरार येथून सुटणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा पर्याय निवडतात; मात्र खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब कोकणवासी चाकरमान्यांची या काळात प्रचंड प्रमाणात आर्थिक लुटमार करतात. विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक आणि परिवहन विभागाचे काही संबंधित अधिकारी यांच्या संगनमतातून यापूर्वीही गणेशोत्सवापासून ते थेट दसरा, दिवाळी, शिमग्यापर्यंतच्या सणासुदीच्या काळात कोकणवासीयांची आर्थिक लुटमार होत आलेली आहे. त्यामुळे आता यावर आला बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.