पंढरपुरातील विठुरायाच्या लाडूचा निकृष्ट दर्जा ; लेखा परीक्षणाचा धक्कादायक अहवाल

0

नागपूर -महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल लेखापरीक्षणातून समोर आला आहे. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून लाडू प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू करण्याचे काम बचत गटाला देण्यात आले होते. बचत गटाकडून ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात, ती जागा अस्वच्छ आहे. तसंच लाडू सुकवण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे.पाकिटावर जे घटक नोंदवले जातात, ते वापरले जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तीन लाडूंचे पाकीट २० रुपयांना विकले जाते. मात्र, या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. होणाऱ्या परिणामास लाडू बनवणाऱ्या बचत गटाबरोबर मंदिर समितीची सुद्धा तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.