लठ्ठपणा आजार आणि आधुनिक उपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अलीकडच्या काही दशकांचा विचार केला तर आपली भारतीय जीवनशैली झपाट्याने बदलताना दिसतेय. चटपटीत, चमचमीत आणि फास्टफूड अशा खाण्याच्या बदलत्या सवयींचा मोठा दुष्परिणाम हा मानवी आरोग्यावर होताना दिसतोय. जंकफूड आणि फास्टफूड अशा चुकीच्या आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अगदी छोट्यांपासून ते जेष्ठांपर्यंत लठ्ठपणा हा आजार वाढताना दिसतोय. लठ्ठपणा म्हणजे केवळ वजन वाढणे इतकाच मर्यादित अर्थ नसून वाढत्या वजनामुळेच हृदयविकार, मधुमेह, लैंगिक अक्षमता वाढणे, फुफुसाचे विकार, किडनीचे आजार अशा प्रकारचे विविध स्वरूपाचे शारीरिक दुष्परिणाम देखील उद्भवतात . हा लठ्ठपणा आजार म्हणजे नक्की काय ? आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी उपाय काय ? लठ्ठपणा कायमचा घालवून विविध शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आधुनिक उपचार पद्धती नेमक्या कॊणत्या आहेत ? या संदर्भात जे टी फाउंडेशनच्या संचालिका आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या लठ्ठपणाच्या विरुद्ध सुरु असलेल्या अभियानाच्या मार्गदर्शिका आणि भारतातील पहिल्या महिला बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांच्याशी केलेली बातचीत.

लठ्ठपणा किंवा स्थूलत्व म्हणजे आजार आहे का ?

होय.. वैद्यकीय शास्त्राच्या संशोधनानुसार लठ्ठपणा किंवा स्थूलत्व हा नक्कीच एक आजार मानला गेला आहे. पूर्वीच्या काळी लठ्ठपणा म्हणजे केवळ सौंदर्याशी संबंधित गोष्ट होती. परंतु बदलत्या भारतीय जीवनशैलीमुळे विशेषतः खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रकार आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते आणि शारीरिक संस्थेची कार्यप्रणाली बिघडते. चयापचय क्रिया देखील बदलते. त्याचाच दुष्परिणाम म्हणजे हृदयविकार , मधुमेह, शरीरातील हार्मोन्समध्ये चुकीचे बदल घडणे, लैंगिक क्षमता कमी होणे, फुफुसाचे विकार बळावतात. लठ्ठपणाचा हा आजार मानसिक तणाव देखील निर्माण करतो त्यामुळे लठ्ठपणावर आपल्या तज्ज्ञ डॉक्टारांकरवी वेळीच उपचार करण गरजेचं आहे.

शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम केला, डाएट केला तरी देखील वजन कमी होत नाही याच कारण काय ?

नियमित व्यायाम म्हणजे फिटनेसची गुरुकिल्ली आहे. परंतु जी माणसं लठ्ठ असतात ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा ३२ च्या पुढे गेला असेल अशा व्यक्तींना व्यायाम करताना दम लागणे, गुडघे, सांधे दुखणे असे त्रास उद्भवतात. मणक्याचा त्रास देखील होतो. थोडक्यात शारीरिक कसरत किंवा व्यायाम अशा व्यक्तींना सहन होत नाही. अशा व्यक्तीच्या फुफुसाला आणि हृदयाला देखील शारीरिक कसरतीचा त्रास संभवतॊ. त्यामुळे नियमित व्यायाम करून किंवा अगदी डाएट केला तरी त्यांचं वजन कमी होत नाही. अशा व्यक्तींनी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन किती प्रमाणात व्यायाम करावा किंवा डाएट कोणता घ्यावा याचे मार्गदर्शन करून घ्यावे.

वाढत्या शारीरिक वजनाचे शारीरिक दुष्परिणाम नेमके काय होऊ शकतात ?

माणसाचे म्हणजे स्त्री किंवा पुरुषाचे वजन हे त्याच्या उंचीनुसार अवलंबून असत. मात्र हे शारीरिक वजन हे खूप फसवे असते अगदी वेगाने ते वाढते आणि त्यानंतर प्री डायबिटिक त्रास सुरु होतो. थायरॉइडच्या ग्रंथी देखील काम करेनाशा होतात. शरीरातील मेटाबॉयलिझम कमी होतो. व्यक्ती जसजशी जाड होत जाते तस तस शरीरातील इन्सुलिन कमी होत जात. परिणामतः अधिक भूक लागण, सतत तहान लागण, एकदा जेवल्यानंतर देखील पुन्हा खाण्याची इच्छा होणं असे विकार बळावू लागतात. अनेकदा मानेभोवती आणि जांघेत व काखेत काळपटपणा येतो, चामखीळ येतात हि सगळी प्री डायबिटिकची लक्षण असतात. याशिवाय हृदयविकार, किडण्याचे विकार, रक्तवाहिन्या जाडसर होणे आणि शरीरातील हार्मोन्सची लेव्हल कमी झाल्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी कमी होत जाणे असे अनेक दुष्परिणाम वाढत्या वजनामुळे शरीरावर होऊ लागतात.

सर्वसाधारण व्यक्तीचे वजन हे किती असावे ?

वजन हे वयानुसार वाढत जात. सर्वसाधारण मनुष्याची उंची हि १५० ते १६० सेंटीमीटर असते. अर्थात या उंचीमधून १०० वजा केले कि जी संख्या उरते ते आपले वजन असायला हवे. वैद्यकीय शास्त्रानुसार अतिरिक्त वजन म्हणजे मनुष्य शरीरावर ओझे बाळगत असतो. मात्र त्यामुळेच अनेक प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम उद्भवू लागतात. आपला बॉडी मास इंडेक्स हा ३० पर्यंत असेल आणि अशा व्यक्तीचे वजन वाढले असेल तर योग्य पद्धतीने व्यायाम करून आणि योग्य तो आहार घेऊन हे वाढते वजन नियंत्रित ठेवता येते. मात्र बॉडी मास इंडेक्स हा ३० च्या पुढे असेल तर शस्त्रक्रिया करून चरबी कमी करून वजन कमी करता येते.

अनेकदा काही तरुणांचे पोट वाढते आणि छाती देखील वाढते यामागचं कारण काय ?

हो.. पौगंडावस्थेत अनेकदा मुलांचं पोट जस वाढत जात तास छातीचा आकार देखील वाढतो. पोटातील फॅट्स वाढतात आणि ते केमिकली ऍक्टिव्ह असल्यामुळे शरीरातील हार्मोन्स सिस्टीम बिघडवतात. मुलींमध्ये वाढत्या वजनामुळे शरीरातील हार्मोन्स सिस्टीम बिघडून लग्नानंतर अशा मुली गरोदर देखील राहू शकत नाहीत . मात्र मूल आणि मुलींमध्ये जर योग्य ते उपचार करून वजन कमी केले तर नक्कीच हार्मोन्स मध्ये बदल घडून त्यांची लैंगिक क्रिया देखील सुरळीत होते आणि मुलांमध्ये छातीचा आकार कमी होतो.

बेरियाट्रिक सर्जरी हि लठ्ठपणावर उत्तम उपचार पद्धती आहे, ती नेमकी काय आहे ?

लठ्ठपणा हा शरीरावर शस्त्रक्रिया करून चरबी कमी करून कमी करता येतो. मात्र शरीरातील मेटाबायलिझम कमी करण्यासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येते. या शस्त्रक्रियेत जठरात जी टोपी असते त्याभागात फॅट न जळल्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते ज्यामुळे हार्मोन्स बिघडतात ती चरबी कढून टाकली जाते. आणि मेटाबायलिझम कमी करता येतो व पर्यायाने वजन देखील कमी होते. ज्यामुळे शरीरावर होणारे इतर दुष्परिणाम टाळता येतात. हि सर्जरी दुर्बिणीद्वारे केली जाते आणि २ दिवसात तो रुग्ण नेहमीच्या कामाला लागू शकतो. हि सर्जरी म्हणजेच बेरियाट्रिक सर्जरी.

लायपोसक्शन बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय ?

लायपोसक्शन सर्जरी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची उपचार पद्धती आहे. शरीरातील जठर आणि आसपासच्या भागातील चरबी यामध्ये कमी करता येते परंतु आपण केस कापल्यानंतर ते पुन्हा उगवतात तसे हि सर्जरी केल्यानंतर पुन्हा शरीरातील चरबी वाढू शकते आणि शारीरिक आजार देखील. शरीरातील मेटाबायलिझमचे प्रमाण तात्पुरत्या स्वरूपात कमी करणे म्हणजे लायपोसक्शन सर्जरी आहे.

लठ्ठपणा टाळायचा असेल तर आपली जीवनशैली म्हणजे आहार आणि विहार कसा असावा ?

लठ्ठपणा टाळायचा असेल तर चमचमीत स्वरूपाचे जंक आणि फास्ट फूड खाण बंद करावं. तळलेल्या पदार्थांचा देखील आहारात समावेश टाळावा. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आहार हा त्याच्या वजनाप्रमाणे घेणं गरजेचं आहे. शिवाय रोज आपल्याला शक्य होईल तितकं चालणं आणि व्यायाम करण देखील तितकाच गरजेचं आहे. शिवाय उत्तम आहार विहराबरोबरच मानसिक आरोग्य देखील स्वस्थ ठेवणं तितकंच गरजेचं असत. शरीराचा मास इंडेक्स योग्य प्रमाणात ठेवला तर लठ्ठपणा नक्कीच टाळता येतो.

बेरियाट्रिक सर्जरी साधारणपणे किती वयापर्यंत करता येते ?

वय वर्ष ८ ते ८२ पर्यंतच्या व्यक्तीवर हि शस्त्रक्रिया करता येऊ शकते. परंतु साधारणपणे ८ ते १० वर्षापर्यंतच्या मुलाला जर लठ्ठपणाचा त्रास असेल तर व्यायाम आणि डाएटने लठ्ठपणा घालवता येतो अगदीच शक्य नसेल तरच शस्त्रक्रिया करावी लागते. १६ वर्षानंतर मात्र शक्यतो वजन कमी करण्यासाठी हि सर्जरी करावी लागते. मात्र शस्त्रक्रियेनंतर मनुष्य अगदी नॉर्मल होतोच आणि विविध शारीरिक आजारांपासून देखील जे लठ्ठपणाशी निगडित असतात त्यापासून मुक्त होतो.

संकलन- सुबोध रणशेवरे 

संपर्क९८३३१४६३५६

 

Leave A Reply

Your email address will not be published.