जळगाव ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या उन्नत महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून आपले प्रश्न आपले विज्ञान या व्दि-दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाला.
यावेळी मंचावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. एस. टी. भुकन, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, उन्नत महाराष्ट्र अभियान कार्यक्रमाचे व्यवस्थापक डॉ. गोपाल चव्हाण, प्रशाळेच्या संचालिका डॉ. मनीषा इंदाणी हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाने ७० कार्यशाळा आयोजित करून २० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कौशल्याधारित, जीवनोपयोगी आणि मूल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने अनेक व्यावसायिक संघटनांशी करार केले आहेत. आजची कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे. डॉ. गोपाल चव्हाण यांनी समाज विकासाच्या दृष्टीने गरजा आणि शिक्षण पध्दती पुढे उभे असणारे प्रश्न यांचा विचार करून उच्च शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. श्री. स्वप्निल अंबुरे यांनी आपले प्रश्न आपले विज्ञान या मोड्यूलबद्दल माहिती सांगितली. तिस-या सत्रात अहवाल लेखन आणि विश्लेषण यासंदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यशाळेत ९० प्राध्यापक सहभागी होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संतोष खिराडे, इंजि. राजेश पाटील, डॉ. रणजित पारधे, डॉ. स्वाती तायडे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.