विद्यापीठाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा

0

जळगाव ;- पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्हयातील ६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून अंदाजे १५ हजार विद्यार्थी व पालकांपर्यंत हे धोरण पोहचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

गेल्या महिन्यात विद्यापीठाशी संलग्नित प्राचार्य, प्राधिकरणाचे सदस्य, संस्थाचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याचवेळी विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत या धोरणाची माहिती व्हावी यासाठी तीनही जिल्हयात कार्यशाळा घेण्यात येतील असे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी जाहीर केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ९ व १० जानेवारी रोजी ही कार्यशाळा होणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील १२ वी प्रवेशित विद्यार्थी, पदवी अंतीम वर्षातील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले आहे. जळगाव जिल्हयातील ३४, धुळे जिल्हयातील १९ आणि नंदुरबार जिल्हयातील ९ महाविद्यालयातील ९ व १० जानेवारी रोजी दोन सत्रांमध्ये या कार्यशाळा होणार आहेत. ज्या महाविद्यालयात या कार्यशाळा होणार आहेत. त्या महाविद्यालयाच्या परिसरातील इतर महाविद्यालयांना देखील आयोजक महाविद्यालयांच्या कार्यशाळे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने २१ तज्ज्ञांची टिम तयार केली असून त्या त्या आयोजक महाविद्यालयांमध्ये जावून हे तज्ज्ञ पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण कशा पध्दतीने लागू होणार आहे, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम कसा असणार आहे यामधील मेजर आणि मायनर विषय म्हणजे काय आदी बाबत सविस्तर माहिती देवून शंकाचे निरसन करणार आहेत. विद्यापीठाच्या गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने या कार्यशाळा होत असल्याची माहिती कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी दिली. एका कार्यशाळेस १५० ते २० विद्यार्थी अपेक्षित आहे. जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत दोन दिवसात हे धोरण पोहचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

या संदर्भात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांची बैठक बुधवार दि. ३ जानेवारी रोजी विद्यापीठात बैठक घेण्यात आली. याबैठकीत कुलगुरू यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. जगदीश पाटील हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.